Loan Waiver: कर्जमाफी कधी जाहीर होणार याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची नजर लागून राहिली आहे. शेतात नुकसान, कर्जाचा भार, त्यात बँकांचे फोन… अशी परिस्थिती असताना आता कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी कर्जमाफीसंदर्भात परदेशी तज्ज्ञ कमिटी नेमण्यात आली आहे आणि या कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे जमा होणार आहे.
“अहवाल आल्यानंतरच पुढचा निर्णय” – भरणे
कर्जमाफी कोणाला मिळणार, किती मिळणार, आणि कोणत्या कर्जाला लागू होणार हे सर्व निर्णय या अहवालावर अवलंबून राहणार आहेत. भरणेंनी सांगितलं की सरकारचा प्रयत्न ३० जूनपूर्वी कर्जमाफी प्रत्यक्षात लागू करण्याचा आहे. Loan Waiver
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
राज्यात मागच्या हंगामात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. अंदाजे १ कोटी ३१ लाख शेतकरी प्रभावित झाले असून १ कोटी २ लाख हेक्टरमध्ये पिकाचं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर सरकारने आतापर्यंत २८ जीआर काढले आहेत. नुकसानाचा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.
केवायसी सुरू, पैसे थेट खात्यात
कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचावी यासाठी केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, असंही भरणे म्हणाले. शेतकरी म्हणतो “आशा आहे, पण आताच हातात काही दिसायला हवं” गावोगाव चर्चा एकच कर्जमाफी आली तर थोडं सावरता येईल. नाहीतर पुढच्या पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा? काही शेतकरी म्हणतात, “घोषणांनी काही होत नाही. तारीख सांगितली ते बरं, पण प्रत्यक्ष पैसा दिसला तरच जीवाला आधार.”
३० जून ही तारीख सध्या तरी महत्वाची
कर्जमाफीबाबत सरकारने कोणतीही अंतिम घोषणा केलेली नाही. पण ३० जूनचा उल्लेख झाल्यावर शेतकऱ्यांच्या मनात थोडासा दिलासा निर्माण झालाय. ही कर्जमाफी प्रत्यक्षात आली तर हजारो शेतकरी परिवारांना पुन्हा शेतीकडे धडपणे वळण्याची हिंमत मिळेल, एवढं नक्की. हल्ली शेतकरी प्रत्येक सकाळी मोबाईलवर बातम्या चेक करतो “कर्जमाफी आली का?” आज त्यालाही वाटलं असेल कदाचित आता खरंच काहीतरी होणार…